भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधेपणाने कार्यक्रम करण्याचं आवाहन केलंय.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधेपणाने कार्यक्रम करण्याचं आवाहन केलंय. जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केले जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.ते आंबेडकर जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाच्या बैठकीत बोलत होते (CM Uddhav Thackeray appeal no crowd on Dr Ambedkar Jayanti amid Corona).
जयंती समन्वय समितीच्यावतीने 14 एप्रिल या जयंतीदिनी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमावलीचे पालन करून कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. चैत्यभूमी स्मारक तसेच मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी गर्दी न करता अभिवादन केले जाईल. राज्यभरातील अनुयायांनाही जयंती साजरी करण्याच्या शासन परिपत्रकातील नियमावलींचे पालन करून साधेपणाने जयंती साजरे करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
‘कठिण परिस्थितीत भीमसैनिकांनी आपण शिस्तीचे भोक्ते असल्याच दाखवून द्यावं’
उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्यावर्षी पूर्ण लॉकडाऊन होते. विषाणूने केवळ शिरकाव केला होता. आता मात्र निर्बंध कमी केले आहेत, पण विषाणूने आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. दिवसागणिक रुग्णवाढ होऊ लागली आहे. जोपर्यंत आपण मनापासून शिस्त पाळत नाही, तोपर्यंत ही रुग्णवाढ कमी होणार नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन करावे लागत आहे. कमीत – कमी गर्दी आणि नियमांचे पालन करूनच जयंती साजरी करावी लागेल. साधारण परिस्थितीत आपण ज्या प्रथा-परंपरा पाळून जयंती साजरी करतो, त्या सर्व गोष्टी तितक्याच सन्मानपूर्व केल्या जातील. भीमसैनिक आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे सन्मान करणारे आपण सर्व डॉ. आंबेडकर यांच्या शिस्तीचे भोक्ते आहोत, हे अशा कठीण परिस्थितीत दाखवून देणे अपेक्षित आणि आवश्यक आहे.”
‘गर्दी न करता विविध समाजोपयोगी उपक्रमांनी जयंती साजरी करा’
“अशा परिस्थितीतही डॉ. आंबेडकर यांचे इंदूमिल स्थित स्मारकाचे काम थांबू दिलेले नाही. तेथील पुतळ्यांची उंची आणि अनुषंगीक गोष्टींना गती देण्यात आली. गर्दी न करता विविध समाजोपयोगी उपक्रमांनी जयंती साजरी करता येईल. रक्तदान शिबीरांचे आयोजन करता येईल. पण त्यासाठी आरोग्य विभाग आणि शासनाच्या सर्व यंत्रणांनी पुरेशी खबरदारी आणि पुर्व नियोजन करणे आवश्यक आहे, हे ध्यानात ठेवून या शिबीरांचे आयोजन करावे लागेल. त्याबाबतचे निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले आहे,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.